
मुंबई: आयसीसीने बुधवारी ताजी टी-२० रँकिंग जाहीर केली. यात भारतीय गोलंदाजांनी मोठी उडी घेतली आहे. टी-२० रँकिंगमध्ये अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तो ऑलराऊंडर्सच्या रँकिंगमध्ये अव्वल पोहोचणारा पहिला भारतीय बनला आहे. बुमराह, अक्षर आणि पांड्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवले होते.
बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होता. बुमराहने ८ सामन्यात १५ विकेट मिळवल्या होत्या. त्याने टी-२० गोलंदाजी रँकिंगमध्ये १२ स्थानांनी उडी घेतली आहे. बुमराह १२व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा अल्जारी जोसेफसह अनेक गोलंदाजांना मागे टाकले आहे.
अर्शदीप टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या नंबरवर होता. अर्शदीपने ८ सामन्यांत १७ विकेट घेतल्या होत्या. अर्शदीपला रँकिंगमध्ये ४ स्थानांनी फायदा झाला आहे. तो १३व्या स्थानावर पोहोचला आहे. टी-२० गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये भारताकडून अक्षर पटेल सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. अक्षर ओव्हरऑल यादीत ७व्या स्थानावर आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. अक्षरने टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली होती.
जर फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास रोहित शर्माला दोन स्थानांनी फायदा झाला आहे. तो ३६व्या स्थानावर आला आहे. विराट कोहलीला सात स्थानांनी फायदा झाला आहे. कोहली ४०व्या स्थानावर पोहोचला आहे.