मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर अद्याप मायदेशी परतलेले नाहीत. त्यातच त्यांचा २०२५मधील सगळ्यात मोठा सामना ठरला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अस्थायी कार्यक्रम जारी केला आहे.
यात भारत-पाकिस्तानचा सामना एक मार्चला ठेवण्यात आला आहे. दरम्यान बीसीसीआयने या वर अद्याप सहमती दर्शवलेली नाही. स्पर्धा पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत खेळवली जाईल. यात १० मार्च रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.
आयसीसीच्या बोर्डाच्या वरिष्ठ सदस्यांनी बुधवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अस्थायी वेळापत्रक जारी केले. सूत्रांच्या माहितीनुसार पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी १५ सामन्यांचा कार्यक्रम सोपवला. यात भारताचे सामने सुरक्षा आणि लॉजिस्टिकल कारणांमुळे लाहोरमध्ये ठेवण्यात आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८ संघादरम्यान एकूण १५ सामने खेळवले जातील.
आयसीसी बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले की, पीसीबीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १५ सामन्यांच्या कार्यक्रमाचा मसुदा सोपवला आहे. यात सात सामने लाहोरमध्ये, तीन सामने कराचीमध्ये तर पाच सामने रावळपिंडीमध्ये ठेवण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पहिला सामना कराचीमध्ये ठेवण्यात आला आहे. तर दोन सेमीफायनल कराची आणि रावळपिंडीमध्ये तर फायनलचा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. भारताला ग्रुप एमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, न्यूझीलंडसोबत ठेवण्यात आले आहे. ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.