मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
मुंबई : ‘विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विरोधकांना आपल्या जबाबदारीचे भान आहे की नाही हे माहिती नाही. सभागृहाबाहेर विरोधक सतत आरोप करतात. आता सभागृहामध्येही ते शिवीगाळ करतात. हे दुर्दैवी आहे. असे कधीही झाले नव्हते, ते घडले. संयम सुटला असेल, मात्र तो संयम राखा. विरोधक म्हणून काम करण्याची सवय लावा. कारण तुम्हाला यापुढेही तिकडेच विरोधातच बसायचे आहे’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानपरिषदेच्या अधिवेशनात विरोधकांना टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना सुरुवातीला टी२० वर्ल्डकप सामन्यात भारताच्या दणदणीत विजयानंतर संपूर्ण क्रिकेट संघाचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी पुढील मुद्द्यांवर बोलायला सुरुवात केली.
जनमत पायदळी तुडवून २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी आम्ही विरोधात उठाव केला आणि नंतर महाराष्ट्रात लोकांच्या मनातले आणि वैचारिक भूमिकेतून सारखे असलेले महायुतीचे सरकार आले. सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. राज्याने आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात प्रगती करावी अशी आमची इच्छा आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय लाभ पोहोचावा, ही धडपड होती. महिला, तरुण, शेतकरी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा, हा प्रयत्न होता. यासाठी मोठी मेहनत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कारभार करतो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले. जनतेचा विश्वास पाहतो आहोत. त्यांच्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा आनंद आहे. विचार, विकास, विश्वास ही आमच्या यशाची त्रिसुत्री आहे, असे म्हणत त्यांनी महायुती सरकारच्या निर्णयांचा लेखाजोगा मांडला.
कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो
‘आमच्या काळात ९ अधिवेशने पार पडली. ७५ कॅबिनेट झाल्या. त्यात ५५० हून अधिक निर्णय आम्ही घेतले. या काळात बरेच वेताळ आडवे आले, पण आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो. हे निर्णय आम्ही घेऊ शकलो, कारण आम्ही घरात बसून नाही, तर लोकांच्या दारात जाऊन, शासन आपल्या दारी नेले. कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.