
मुंबईतल्या 'या' प्रसिद्ध कॉलेजचा नवा नियम
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील एन.जी आचार्य मराठे कॉलेजने (Acharya Marathe College) हिजाब, बुरखा, नकाब, टोपी (Hijab Ban) यावर बंदी घातली होती. त्यानिर्णयानंतर कॉलेज चर्चेत आले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना कॉलेज मॅनेजमेंटने पुन्हा नवा नियम जारी केला आहे. आचार्य मराठे कॉलेजच्या अशा वेगळ्या निर्णयामुळे कॉलेजला पुन्हा एकदा चर्चेचे स्वरुप आले आहे. यामुळे कॉलेजच्या मॅनेजमेंटवर चहुबाजूने टिका होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कॉलेजमध्ये जाताना बहुतेक तरुण-तरूणी स्टायलिश कपडे घालून जातात. त्यावर आचार्य कॉलेजने आक्षेप घातला आहे. या संदर्भात कॉलेज व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापत्र जारी केले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रतिज्ञापत्राचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किंवा टी शर्ट घालून येता येणार नाही.
कॉलेजच्या नोटिसमध्ये काय म्हटले?
विद्यार्थ्यांनी औपचारिक आणि सभ्य कपडे घालावेत असे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या पोशाखातून धर्माचे प्रदर्शन होईल किवा सांस्कृतिक विषमता दाखवेल असे कपडे घालता येणार नाहीत, असे कॉलेजने स्पष्ट केले आहे. तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये जीन्स टी शर्ट, उघड कपडे आणि जर्सी घालण्यास मज्जाव करण्यात आल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात कॉलेजमध्ये बुरखा किवा हिजाब टोपी घालून येता येणार नाही असे म्हटले होते. त्याच आधारे कॉलेज व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.