पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पुणे, मुंबई, पालघर, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Heavy rain in Konkan) तर इतर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, गोवा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व ताशी २० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘राजाराम’सह ५ बंधारे पाण्याखाली!
दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ झाल्याने राजाराम बंधार्यासह रुई, इचलकरंजी, सुर्वे, यवलूज हे पाच बंधारे पाण्याखाली गेले. यावर्षीच्या पावसात शनिवारी पहिल्यांदाच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला.
पंचगंगेच्या पातळीत तीन दिवसांत साडेतीन फुटांची वाढ झाली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक ४४.२ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे. जवळपास अख्खा जून कोरडा गेल्यानंतर तीन दिवसांपासून हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे.