
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरून (Nashik Mumbai Highway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी (Toll) आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) आचारसंहितेमुळे (Code Of Conduct) निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर एप्रिलपासून नवीन दर लागू करण्यास निर्बंध घातले होते. मात्र आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाका येथे वाहनांच्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत आता मुंबईकरांच्या प्रवासाचीही भर पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गावर घोटी (ता. इगतपुरी) ते अर्जुनली टोलप्लाझा (जिल्हा ठाणे) या ९९.५० किलोमीटरच्या मार्गावर वाहनांसाठी उद्यापासून नव्याने शूल्क लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार कार व जीपसाठी १४० रुपये मोजावे लागणार आहेत. स्थानिक व जवळील प्रवासी तसेच स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी अनुक्रमे १५ व ३५ रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. हे दर प्रतिवाहन एका बाजूच्या प्रवासासाठीच लागू असणार आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांच्या खिशाला टोलनाका दरवाढीमुळे आणखी फटका बसणार आहे.
ट्रक-बससाठीचे दर
घोटी टोलनाका येथे हलक्या मालवाहक वाहनांसाठी २४५, ट्रक आणि बसकरिता ४९०, तर स्थानिक प्रवासी वाहनास १२० रुपये द्यावे लागणार आहेत. दोन एक्सलपेक्षा अधिकचे वाहन व उत्खनन व बांधकामासाठीच्या अवजड मशीनरीसाठी ७८५ रुपये व स्थानिकसाठी १९५ रुपये दर चालकांना मोजावे लागणार आहेत.