
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India Vs South Africa) ७ धावांनी पराभव करत आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने १७७ धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ८ बाद १६९ धावांवर रोखलं. टीम इंडियाने अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकला.
मात्र, यानंतर क्रिकेटप्रमींना दोन धक्कादायक बातम्या मिळाल्या. विजयानंतर लगेच विराट कोहलीने (Virat Kohli) तर त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली. यानंतर आता भारतीयांना तिसरा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर टी २० वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटो पोस्ट केला आहे. जडेजाने लिहिलं आहे की, “मनःपूर्वक आभार, मी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतोय. मी नेहमीच अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे देशासाठी १०० टक्के देत राहीन. तसेच मी इतर फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. टी २० वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. अविस्मरणीय आठवणी, उत्साह आणि बिनशर्थ पाठिंब्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद", असं जडेजाने इंस्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, हे तिन्ही खेळाडू कसोटी आणि वनडेमध्ये दिसणार आहेत.
कशी होती रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द?
रवींद्र जडेजा पहिल्यांदा टी-२० विश्वचषक २००९ मध्ये खेळला, त्यानंतर तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहिला. या अष्टपैलू खेळाडूने ७४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये एक फलंदाज म्हणून त्याने २१.४६ च्या सरासरीने आणि १२७.१६ च्या स्ट्राईक रेटने ५१५ धावा केल्या. त्याच वेळी, रवींद्र जडेजाने भारतासाठी गोलंदाज म्हणून टी-२० सामन्यांमध्ये ७.६२ इकॉनॉमी आणि २९.८५ च्या सरासरीने ५४ बळी घेतले.