मुंबई: भारताचा सलामीवीर विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.
भारताला पहिला धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजीस सुरूवात केली खरी मात्र केशव महाराजचा तो बळी ठरला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. सूर्य कुमार यादव मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच रबाडाने त्याला ३ धावांवर बाद केले.
त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलची जोडी जमली. अक्षर पटेलने या सामन्यात ४७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. तर विराट कोहलीने ७६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने ५९ चेंडूमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावताना ७६ धावा साकारल्या.
पटेल गेल्यानंतर विराटने शिवम दुबेला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने २७ धावा केल्या. खरंतर शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चांगल्या धावा करणे गरजेचे होते. मात्र तितक्याशा चांगल्या होऊ शकल्या नाहीत. अखेर भारताची धावसंख्या १७६वर संपुष्टात आली.