Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीजग म्हणजे माझा विस्तार...

जग म्हणजे माझा विस्तार…

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येच्या सिद्धांतानुसार, मोक्ष हा असूच शकत नाही, याचे कारण सच्चिदानंद स्वरूप हे देवाचे स्वरूप आहे. तो नुसता असण्याच्या अवस्थेत होता. त्याच्या ठिकाणी स्फुरण झाले. स्फुरण कोणामुळे झाले? आनंदामुळे स्फुरण झाले. हे जाणिवेला गोड वाटते. या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठीच ही जाणीव “एकोहं बहुस्याम” झाली. अनंतकोटी ब्रह्माण्डे ही जी निर्माण झाली, त्याला कारण हेच आहे.

माझिया विस्तारलेपणाची निनावे, हे जगची नोहे लागावे
जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेचि दही का बीजची झाले तरू
अथवा भांगारूची अलंकारु
तैसा मज एकाचा विस्तार,
ते हे जग.

जग म्हणजे माझा विस्तार आहे. विस्तार म्हणजे देवाचा संसार. माणसाचा ही विस्तार होतो की नाही? माणूस एक असतो, लग्न केले की एकाचा दोन होतो. मुलगा होतो, मुलगी होते. जावई, सून, नातवंडे येतात. मुलांना मुले होतात. “तैसा मज एकाच विस्तार ते हे जग.” परमेश्वराच्या ठिकाणी जे आहे, तेच आपल्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्यालाही तसेच वाटते. परमेश्वराच्या ठायी जे स्फुरण आहे, तेच आपल्या ठिकाणी आहे, म्हणूनच “एकोहं बहुस्याम.” परमेश्वराला जसे वाटले, तसेच आपल्यालाही वाटले. पण मग परमेश्वराच्या ठिकाणी “एकोहं बहुस्याम” हे स्फुरण का झाले? त्याच्या ठिकाणी जो आनंद आहे, तो आनंद स्फुरला. आनंदाचे स्वरूपचं स्फुरद्रूप आहे. आनंद नेहमी स्फुरद्रूप असतो.

समुद्रात नेहमी छोट्या-मोठ्या लाटा या उसळत असतात. समुद्र सपाटच असला पाहिजे, असे म्हटले तरी चालणार नाही. तसे आपल्या ठिकाणी आनंद उसळतच असतो. सतत उसळत असतो. आनंदासाठीच सगळे चाललेलं आहे. माझे प्रबोधन चाललेले आहे, ते आनंदासाठीच. दुःखासाठी चाललेलं आहे का? माझे प्रबोधन ऐकून तुम्हाला आनंद होतो व तुम्हाला हे दिले म्हणून मला आनंद होतो. शेवट हे perpetual आहे. Law of Reciprocal Relationship. मी तुम्हाला आनंद दिला आणि तुम्हाला आनंद झाला म्हणून मला आनंद झाला. सांगायचं मुद्दा प्रत्येक गोष्ट आनंदासाठीच आहे. भूक लागलेली असताना भोजनाला बसलो, समोर ताट आले की, कधी हर हर महादेव म्हणतो असे होते. त्यावेळी देव, गुरु, सद्गुरू काहीही नाही, फक्त अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता, तसे याला ते ताट व ताटातले पक्वान्ने दिसतात.

भोजन का करतो? ते आनंदासाठी असते. लग्न कशासाठी करतो ? आनंदासाठी. पुढे जर दुःखी झाले तर तो भाग वेगळा. ते तो त्याच्या मूर्खपणामुळे होतो. शहाणपणाचा अभाव म्हणून ते होते. शहाणपण असेल तर संसार सुखाचा होतो. आम्ही फक्त शहाणपण देतो. बाकी काही देत नाही. त्या शहाणपणाने लोक सुखी झाले. हे शहाणपण महत्त्वाचे आहे. हे शहाणपण स्वीकारायचे की नाकारायचे, हे तुम्हीच ठरवायचे, म्हणूच “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -