सातारा : सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi 2024) सोहळा साजरा होणार आहे. लाखो भाविक या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. भाविकांची होणारी मोठी गर्दी पाहता गतवर्षीप्रमाणे यावेळीही पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पालखीसोहळा कालावधीत कोणताही अपघात होऊ नये व वाहतूक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, ‘नागरिकांनी सहकार्य करावे’ असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात यंदा ६ ते ११ जुलै या कालावधीत पालखीसोहळा असणार आहे. हा पालखीसोहळा नीरा- लोणंद-फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार आहे. या सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असल्याने या कालावधीत फलटण येथून पुणे, नीरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळवण्यात आली आहे. ५ ते ८ जुलै या कालावधीत आदर्वी फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांखेरीज इतर वाहनांना बंद करण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी सांगितले.
या मार्गावरील वाहतूकीचे दुसरे वळण
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान ५ ते १० जुलै या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्वीमार्गे फलटणकडे वळवण्यात आली आहे.
- ५ ते ९ जुलैदरम्यान फलटण ते लोणंद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
- ९ ते ११ जुलै या कालावधीत फलटण ते नातेपुतेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज येथून बारामतीमार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.
- त्याचबरोबर नातेपुतेकडून फलटणमार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहीकडी-सातारा अशी वळवण्यात येत आहे. तर पुण्याकडे जाणारी वाहतूक दहीगाव-जांब-बारामतीमार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे. नातेपुते काई काठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिवाटणे-शिंगणापूर जाकली-कोलकी-झिरपकाडी-किंचुर्णी-ढवळपाटी काठार फाटामार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, १० जुलै रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून बरड मुक्कामी सकाळी ६ वाजता मार्गस्थ होणार आहे. यावेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण- दहीकडी चौक-कोळकी, शिंगणापूर तिवाटणे-वडले पिंप्रद बरड अशी वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह इतर नागरिकांनी देखील पोलिसांच्या यंत्रणेला सहकार्य करा, असे पोलीसप्रमुखांनी म्हटले.