मुंबई : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन उद्या गुरूवारपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला गेला. त्यानंतर सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खोट बोल पण रेटून बोल,असे खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीत यश मिळाले तर आता खोटेच बोलायचे आहे,अशी मानसिकता व अर्विभाव हा विरोधकांचा आहे. किंबहुना त्यांनी दिलेले पत्राचे एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात त्यांचा चेहरा पाहावा’, असे फडणवीस म्हणाले. विदर्भातील सिंचन प्रश्नावर सरकारचे अपयश,असे म्हणतात. पण हे अपयश हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहे. मध्यंतरी सरकारमध्ये पैनगंगा प्रकल्पाची फाईल हलली नाही. त्यांच्या काळात विदर्भातील एका प्रकल्पाला मान्यता दिली नाही. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले पण आम्ही स्वत: त्याला प्रस्ताव देऊन चालू केले. ते आम्हाला विचारतात. वॉटर ग्रीडचे काय झाले. पण त्यांनीच या मराठवाड्यातील वॉटर ग्रीड रोखले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आता नीट पेपरफुटीवरून विरोधक आम्हाला बोलत आहेत. पण, विरोधकांना हे माहित नसेल की, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक पेपरफुटीचे प्रकरण घडले. त्यात ते गुंतवणूकदारांकडून महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचे सांगतात. पण ते विसरतात की, तीन नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्या क्रमांकावर आले आहे.
ड्रग्जच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली. संपूर्ण देशात लढाई सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात ही कारवाई होऊ लागली आहे. त्यामुळे ही कारवाई थांबणार नाही. कायदा सुव्यवस्था असो की झिरो टॉलरन्स धोरण ठेवून ड्रग्जवर कारवाई होत आहे.अनेक विषय विरोधी पक्षाने मांडले. पण जितक्या वेळा ते बोट आमच्याकडे उगारतात पण तितक्या वेळा चार बोट त्यांच्याकडे होतात. खिचडी घोटाळा, मृतदेहाचे बॅगा खाल्ले, मीडियामध्ये बोलण्यापेक्षा सभागृहात बोलावं, त्याची उत्तरे आम्ही देऊ. सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ. या काळात चांगला अर्थसंकल्प मांडला जाईल. विकासाला बळ देणारे हे अधिवेशन ठरेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उद्या अंतरिम अर्थसंकल्प
राज्य सरकार २८ जून रोजी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनामध्ये राज्यातील दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्य सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावेळी पत्रकार परिषद घेत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली होती, पण खरंतर ही जुमलेबाजी आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. २०१३मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते, तेच २०२४ला मिळत असतील, तर शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या महायुतीने केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्कारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील, अशी आशा होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.