पुढे ढकलण्यात आलेल्या मैदानी चाचण्या लवकरच घेणार
दुसऱ्या शहरातून आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश
मुंबई : राज्यात १९ जूनपासून १७ हजार ४७१ पदांसाठी मेगा पोलीस भरतीची (Police Bharti 2024) सुरुवात झाली आहे. यासाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे राज्यातील बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
उमेदवारांच्या या मागणीची दखल राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी घेतली असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
ज्या ठिकाणी पाऊस सुरु आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मैदानी चाचण्यांसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देखील युनिट्सला देण्यात आले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, सध्या ज्या ठिकणी पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आले आहे. पुढे ही पावसाचे दिवस आहे आणि त्यानंतर राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे सरकारकडून पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न होत आहे. कारण जर या चाचण्या खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिमाण होऊ शकतो. कारण अनेकांसाठी ही शेवटीची संधी ठरू शकते. त्यांना दुसरी संधी भेटत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस आहे त्यांनी ठिकाणी चाचण्यांसाठी दुसऱ्या तारखा देण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले.
तसेच मैदानी चाचणीसाठी उमेदवार दुसऱ्या शहरातून येतात त्यांना राहण्याची जागा नसते. त्यामुळे अनेकजण बस स्टॅण्डवर झोपताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी भरतीच्या ठिकाणी जवळ असलेल्या मंगल कार्यालयात त्यांची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना दिले असल्याची देखील माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.