
लोकसभेचे काम संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांची कामाला सुट्टी; प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत
मुंबई : मुंबईत पावसाला सुरुवात झाली असताना अनेक कामे मुंबई महापालिकेची (BMC) कर्मचाऱ्यांच्या अभावी रखडलेली असतात. या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुंबई महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) कामांसाठी (Election Duty) पाठवण्यात आले होते त्यांना कार्यमुक्त करावे, अशा प्रकारचे पत्र दिले होते. मात्र निवडणूक, निकाल अशा सर्व गोष्टी पूर्ण होऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी कामचोरपणा दाखवल्याचे चित्र दिसून आले आहे. कार्यमुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचारी अद्यापही कामावर रुजू झाले नसल्यामुळे पालिका प्रशासनाने त्यांच्याबर सक्तीच्या कारवाईचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मुंबई महापालिकेचे ११ हजार ८५१ कर्मचारी कार्यरत होते. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरसुद्धा अजूनही ४ हजार ३९३ कर्मचारी मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कामावर रुजू झालेले नाहीत. यामध्ये काही अधिकारी कर्मचारी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी लावण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याव्यतिरिक्त इतर कर्मचारी अद्यापही कामावर आलेले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक जबाबदारीच्या नावाखाली कामावर येण्याची टाळाटाळ करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने त्यांचे वेतन रोखण्यात येईल असा इशारा देत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कार्यमुक्त करूनसुद्धा महापालिकेच्या कामावर रुजू न झालेल्या महापालिकेने १२३ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे.