मूलभूत सुविधा देण्यासाठी सिक्कीम सरकारचे अथक प्रयत्न सुरु
गंगटोक : सध्या देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून काही राज्यांना पावसाने (Heavy rainfall) झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही जिल्ह्यांना अद्याप दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे सिक्कीममध्ये (Sikkim rain) काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे त्या ठिकाणी भूस्खलनाची (Landslide) घटना घडली असून यातील मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. काल सायंकाळपर्यंत सिक्कीममध्ये आलेले सुमारे २,००० हजार पर्यटक यात अडकले होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सिक्कीममध्ये सर्वात उत्तरेकडील प्रदेश मंगन जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, उत्तर सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात साधारण २२० मिमी पेक्षा अधिकचा पाऊस झाला. मात्र त्याचवेळी सततच्या पावसानंतर सिक्कीममधील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.
सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक भागातील घरांची पडझड देखील झाली आहे. दक्षिण सिक्कीममधील दमथांग तसेच पश्चिम सिक्कीममधील ग्लालशिंग आणि गंगटोक यासारख्या अनेक भागात १३ दिवसांच्या कालावधीत ३० मिमी ते ५० मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. IMD नुसार, यावर्षी १३ दिवसांत तब्बल २५० मिमी पावसाची (Monsoon) नोंद झाली. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी काय पावले उचलली?
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीम मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेनंतर निवेदन जारी केले होते. त्यात सिक्कीममध्ये सरकारने मदत आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा शपथविधी काही दिवसांपूर्वी पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग म्हणाले की, ‘पिडित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत आणि तात्पुरती व्यवस्था तसेच आवश्यक असलेली मदत देण्याचे अथक प्रयत्न केले जात आहेत.