काँग्रेस आणि पवार साहेब उद्धव ठाकरेंना विधानसभेत २५ पेक्षा जास्त जागा देणार नाहीत
नितेश राणे यांची उबाठावर जळजळीत टीका
मुंबई : ‘संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आज सकाळी अण्णा हजारेंना (Anna Hazare) काही घोटाळ्यांची आठवण करुन देत होते. पण मला आठवतं की आमचे मोठे साहेब हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे अण्णा हजारेंचा ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ म्हणून उल्लेख करायचे. त्याच अण्णा हजारेंना तुम्ही आणखी काही घोटाळ्यांवर लक्ष घाला, असं म्हणण्याची वेळ या भांडुपच्या कैदी नंबर ४२० वर आलेली आहे. एवढीच जर त्याला खाज असेल तर त्याने अण्णा हजारेंना कोविड घोटाळ्यातसुद्धा लक्ष घालायला सांगितलं पाहिजे’, असा टोला भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिले.
ज्या कोविड घोटाळ्यात संजय राऊतचा मालक, मालकाचा मुलगा, मालकाचा मेहुणा हे सगळे बरबटलेले आहेत, त्याही घोटाळ्यांमध्ये अण्णा हजारेंनी लक्ष घालावं, अशी विनंती संजय राऊतने केली तर त्यात काही वाईट नाही, असं नितेश राणे म्हणाले. पुढे ते म्हणाले, पदांचा गैरवापर काय असतो, अहंकार काय असतो, हे जर पाहायचं असेल तर अडीच वर्षांचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर ते दिसेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्याएवढा आणि सल्ले देण्याएवढा हा भांडुपचा देवानंद निश्चित पद्धतीने मोठा नाही. कारण तुम्हालाही हिंदुत्वाबद्दल काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते. ते तुम्ही किती ऐकले? त्या विचारांचं किती पालन केलं? म्हणून उगाच दुसर्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे याचा आधी अंदाज घ्या, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
…तेव्हा फडणवीस खलनायक वाटले नाहीत का?
आमच्या फडणवीस साहेबांना खलनायक म्हणतोस मग तू त्यांना कलिनाच्या हॉटेलमध्ये का भेटायला गेला होतास? तुझ्या मालकाला मातोश्री २ साठी परवानग्या हव्या होत्या तेव्हा देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत, असं तुला वाटलं नाही का? काँग्रेसच्या तुकड्यांवर जगणारे तुम्ही लोक दुसर्यांना खलनायक बोलण्याअगोदर तू आणि तुझा मालक महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर झाला आहात, त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग तुझं थोबाड उघड, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत आणि त्याचा मालक गांजा गँग
संजय राऊत यांनी ‘सुपारी गँग’ या केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, मग संजय राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कोणती गँग आहे? बेवडा गँग की गांजा गँग? दुसर्यांना सुपारी गँग बोलण्याआधी तुम्ही जी पवार साहेबांची गांजा गँग बनून महाराष्ट्रात फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना विधानसभेत २५ पेक्षा जास्त जागा देणार नाहीत
काँग्रेस आणि पवार साहेब उद्धव ठाकरेंना लायकीप्रमाणे २५ पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाहीत. कारण ठाकरेंचे मोजून १३-१४ आमदार राहिले आहेत, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. स्वबळाची भाषा तर दूरच कारण यांचे नऊच्या नऊ खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकवूनच निवडून आले आहेत. स्वतःच्या ताकदीवर आले नाहीत. यांचा मूळ मराठी मतदार यांच्यापासून कधीच दुरावलेला आहे. हिंदूनी यांना मतदानच केलेलं नाही, असं नितेश राणे म्हणाले.