प्रवाशांचा प्रशासनावर तीव्र संताप
मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) घेतलेल्या तीन दिवसीय मेगाब्लॉक (Megablock) नंतरही एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी भांडूप आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. विक्रोळी येथे फास्ट ट्रॅकवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी ८च्या सुमारास रेल्वे प्रशासनाने हा बिघाड दुरुस्त केला. मात्र तरीही लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे सकाळ सकाळीच प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, एकीकडे पावसाच्या सरी तर दुसरीकडे ,मध्य रेल्वेवरील वाहतूकीचा खेळखंडोबा सुरुच असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.