
चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानामुळे चर्चांना उधाण
कोल्हापूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांची भाजपाने एनडीए सरकारमध्ये (NDA Government) केंद्रीय आरोग्यमंत्री पदावर नियुक्ती केली आहे. त्यामळे आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी (BJP National President) नवा नेता निवडला जाणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेलं वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
कोल्हापूरमध्ये आज माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विनोद तावडे हे कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांना जिथे पाठवू त्याठिकाणी यश कसे मिळेल, यादृष्टीने सगळे बारकावे ते पाहतात. १९९५ ला तावडे महाराष्ट्रात सरचिटणीस झाले. नंतर चार वर्षात ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. यानंतर ते भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेले, आता ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत. आज भाजप पक्ष चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना काय द्यायचं आणि काय नाही, हे केंद्र सरकार ठरवेल. भाजपमध्ये खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तर ते मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे पाटील यांनी सूचकपणे म्हटलं की, विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.