
महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाची ठिणगी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुतीपेक्षा (Mahayuti) जास्त जागा जिंकल्याने आता मविआ राज्यात एकनिष्ठ राहून काम करेल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, या अंदाजाला छेद देत मविआने पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी सांगलीतून थेट ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला होता. यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि अंतिमतः विशाल पाटीलच विजयी झाले. यामुळे मविआला मोठा फटका बसला. मात्र, यातून धडा न घेता ठाकरेंनी पुन्हा तशीच चूक विधानपरिषदेत (Vidhan Parishad) केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.
महाविकास आघाडीत आता नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने विधानपरिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.
कधी होणार विधानपरिषद निवडणुका?
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. तर ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.