पाणी आहे म्हणून तर
सृष्टी झाली निर्माण
पाण्यामुळेच चराचरात
फुलले पंचप्राण
पाणी पिऊन हुशार होऊन
हसले पान न् पान
झाडेवेली बहरून गेली
डोलू लागले रान
पाण्यामुळेच सुखावतो
ओसाड उजाड माळ
पाण्यामुळेच आपला
सुरक्षित भविष्यकाळ
पाण्याअभावी जीवानाचे
होई वैराण वाळवंट
डोळ्यांत दाटते पाणी
आणि शुष्क होई कंठ
म्हणूनच पाणी नुसतं
आपल्यासाठी नाही द्रव्य
पृथ्वीचं स्पंदन ते
आपल्यासाठी अमृततुल्य
पाणी देते प्राणिमात्रांच्या
जीवास जीवनदान
म्हणूनच पाणी जपण्याचे
करूया सर्वश्रेष्ठ काम
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) लहान मोठ्या साऱ्यांची
भाषा त्याला येई
गाणी, गोष्टी आणखी
सांगे बरेच काही
कपाटात बसायला
नाही त्याला आवडत
ज्ञानाचा खजिना
पानांत कोण दडवत?
२) उन्हात उभे राहून
सावलीत साऱ्यांना घेतात
शुद्ध प्राणवायूही
भरभरून देतात
पर्यावरणाचा समतोल
राखतात किती छान
सांगा मुलं कोणाची
फळ, फूल, पान?
३) सागर काठांवर
असे यांची दाटी
ओल्या, सुक्यांची
होते मग वाटी
भाजीत घालतात
करंजीत भरतात
देवापुढे कोणाची
शेंडी बर धरतात?
उत्तर –
१)पुस्तक
२) झाड
३) नारळ