मुंबई : मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी (Mumbai Rain) लागल्याने नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पहिल्याच पावसाचा मध्य रेल्वेला (Central Railway) फटका बसल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच पावसाने मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून त्यांना ऐन पावसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरु आहेत. तर दुसरीकडे काही स्थानकात धीम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरू आहेत. परिणामी काही भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कामावर तसेच वीकेंड दरम्यान फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
दरम्यान, पहाटेपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये संततधार बरसत आहे. हवामान विभागाकडून पुढील ३ ते ४ तास मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरात विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.