२० मे रोजी घेतलेली ‘ती’ पत्रकार परिषद ठाकरेंना चांगलीच भोवणार!
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) दिले आहेत. त्यामुळे उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election result) जाहीर होण्याच्या वेळीच उद्धव ठाकरेंवर मात्र संकट येणार असल्याची चिन्हे आहेत. मुंबईतील मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० मे रोजी उद्धव ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद या सगळ्यासाठी कारणीभूत ठरली आहे. यातील उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेप घेत तक्रार नोंदवली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मतदानात जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला होता. मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. पण निवडणूक यंत्रणा कमी पडली. ज्या जागांवर भाजपा व महायुतीला हरण्याची भीती आहे, अशा ठिकाणी मतदारांचा खोळंबा केला गेला, त्यामुळे कंटाळून मतदार निघून गेले, असंही ते म्हणाले होते. तसेच मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.
आचारसंहिता लागू असताना एखाद्या पक्षाविरोधी वक्तव्य करणं हा आचारसंहितेचा भंग असतो. त्यामुळे आशिष शेलार यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहितेचं उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेतली गेली आहे.
उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात त्यादिवशी पत्रकार परिषदेत नेमके काय झाले? याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर केला आणि तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत सापडणार आहेत.