शेअर मार्केटमधील तेजीचं नेमकं कारण काय?
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) निकाल उद्या म्हणजेच ४ जून रोजी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात (Share Market) मोठ्या घडामोडी घडणार आहेत. राज्यात मोदींचे सरकार पुन्हा आल्यास शेअर बाजार उसळण्याची शक्यता आहे. तर देशात सत्तांतर झाल्यास हाच निर्देशांक गडगडू शकतो. मात्र, त्याच दरम्यान वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी जारी केलेल्या एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम आज सकाळच्या प्री-ओपनिंग मार्केटमध्येच दिसून आला. प्री-ओपनिंग मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) यांच्यात मोठी उसळी पाहायला मिळाली.
सध्या शेअर बाजाराचे निफ्टी आणि सेन्सेक्स (Nifty and Sensex) हे प्रमुख निर्देशांक चांगल्या स्थितीत दिसत आहेत. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्सने ३०५१ अंकांनी तर निफ्टीनेही ८७० अंकांनी उसळी घेतली. पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट २२०० पर्यंत उसळला. तर बाजार चालू होताच निफ्टीदेखील थेट २३,३३७.९ अंकापर्यंत वधारला. सेन्सेक्सने ७६,७३८.८९ अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.
शेअर मार्केटमधील तेजीचं नेमकं कारण काय?
लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्थिरता आहे. गुंतवणूकदार खबरदारी घेऊनच पैसे गुंतवत आहेत. असे असतानाच १ जून रोजी एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. या आकड्यांत पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच कारणामुळे सध्या शेअर बाजारात निफ्टी, सेन्सेक्स सकारात्मक दिसत आहेत. देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.
…तर बाजारावर नकारात्मक परिणामही होऊ शकतो!
स्वस्तिका इनव्हेस्टमार्ट लि.चे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, शुक्रवारी अनेक एक्झिट पोल्सनी एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. पण त्याचवेळी जर प्रत्यक्ष निकालात एक्झिट पोलपेक्षा काही वेगळे चित्र दिसले तर बाजारावर त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात.