पाणी अडवा पाणी जिरवा
सरकारी आदेशच फिरवा
एकदिलाने काम करूया
जलस्त्रोत नव्यानं शोधूया
घसे सुकले, शेत करपले
दाहीदिशात हंडे फिरले
किती मुलांचे राही शिक्षण
पाण्यापरी निव्वळ वणवण
कुठे जरासे फिरकले ‘नाम’
सांगे ज्ञानी आता करा आराम
किती कालवे आम्ही काढले
सारे कसे निर्जलच राहिले
संवर्धन जलाचे करावे कसे?
पाणलोट क्षेत्र भरावे कसे?
जलसंपत्ती देणे ईश्वराचे
हेची गूढ असे विज्ञानाचे
चळवळ वनराई बंधाऱ्याची
हवी मदत लोकसहभागाची
सारे मिळून करू जलसंवर्धन
पुन्हा फिरूनी होई हरितवन
जगभर चाले संघर्ष पाण्यासाठी
कदाचित पाणी कारण युद्धासाठी
आता शहरातही डंका पिटवा
थेंब थेंब पाणीजागर व्हावा.
विवेकानंद यशवंत मराठे, ठाणे (पश्चिम)
अढळ
घराच्या भिंतीना गंध असतो माणसाचा
वर छप्पर आधाराला
टेकू त्यास मायेचा…१
घरात असतो राबता स्नेही नातलगांचा
देवघरात मंद दरवळ
उद, धूप, गंधाचा…२
मिळतं प्रेम, आधार, स्पर्श आपलेपणाचा
बाळासाठी इथे असतो वर्ग सुसंस्कारांचा…३
इथे मेळ आजी, आबो भावंड, आई बाबाचा
सोबतीला वावर मनी,
भुभू,दारी गाईचा..४
घर देतं बळ पंखाना
तू उंच भरारी घेताना विसरू नकोस तुझी
वाट पाहणाऱ्यानां …५
कधी जरी झालाच घरात अंधार संकटाचा
एक मंद दिवा तेवतो परस्पर विश्वासाचा…६
घर असतंच अढळ
कवेत घेतं केव्हाही
प्रेमाला नाही खळ
हरून आलात तरीही..