
पंजाबमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
चंदीगड : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahd) यांनी मनुस्मृतीविरोधातील आंदोलनात चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडल्यामुळे राज्यभरातील वातावरण प्रचंड तापलं आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील पंजाबमधून संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसला (Congress) घेरलं आहे. नरेंद्र मोदी यांची पंजाबच्या होशियारपूरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर (INDIA Allinace) निशाणा साधला. 'काँग्रेसला दलित आणि मागासलेल्यांचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना द्यायचे आहे.', असा गंभीर आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी या सभेमध्ये भाषण करताना सांगितले की, 'मोदींनी एक संकल्प केला आहे की दलित, मागासलेले आणि आदिवासींचे आरक्षण कोणालाही हिसकावू देणार नाही. माझ्या १० वर्षांच्या सरकारच्या काळामध्ये मी लागोपाठ एससी-एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाचे रक्षण केले आहे. हे काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले माझ्या या प्रयत्नांमुळे भडकले आहेत. आरक्षणावरून त्यांचा हेतू खूपच खतरनाक आहे. त्यांचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड हा एससी-एसटी आणि ओबीसचे आरक्षण हिसकावून घेण्याचा आहे', अशी टीका मोदींनी केली.
तसंच, 'सरकारी नोकरीमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण असो, फोर्समध्ये, सरकारी टेंडरमध्ये, युनिव्हर्सिटीच्या दाखल्यामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण हिसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते संविधानाच्या भावना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनांचा अपमान करत आहेत. त्यांना दलित आणि मागासलेल्यांचे आरक्षण हिसकावून ते फक्त मुस्लिमांना द्यायचे आहे. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचे त्यांचे हे आणखी एक मोठे षडयंत्र आहे. २०२४ च्या या निवडणूक अभियानामध्ये मोदींनी त्यांच्या या सर्वात मोठ्या षडयंत्रावरून पडदा उचलला. त्यांचा प्रयत्न मोडून काढला म्हणून ते संतापले आहेत. त्यामुळे ते लागोपाठ मोदींना शिव्या देत आहे', असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी याआधी उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती येथे झालेल्या सभेमध्ये देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी घटनादुरुस्ती आणि आरक्षण रद्द करण्याबाबत विरोधकांच्या विधानाचे पंतप्रधानांनी खंडन केले होते. त्यांनी सांगितले होते की, 'जोपर्यंत मोदी जिवंत आहेत तोपर्यंत गरीब, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मी वंचितांच्या हक्काचा चौकीदार आहे याची मी हमी देतो.'