तब्बल २३ वर्षांनंतर लागला निकाल
मुंबई : मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांडात (Jaya Shetty murder case) कुख्यात गुंड छोटा राजन (Chhota Rajan) दोषी सिद्ध झाला आहे. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने (CBI Court) आज हा निकाल दिला. २००१ साली जया शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून छोटा राजनला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी गुंड छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी गेल्याच वर्षी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पानसरे यांना दोषी सिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा छोटा राजनला भारतात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या विरोधातील देशभरातील सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात त्याच्या विरोधातील एकेका खटल्यावर सुनावणी सुरु आहे. त्यापैकीच एक शेट्टी हत्या प्रकरण एक आहे आणि या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून छोटा राजनला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
काय आहे जया शेट्टी खून प्रकरण?
जया शेट्टी या हॉटेल व्यावसायिक होत्या. मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या त्या मालकीण होत्या. छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी टोळीकडून फोनही येत होते. जया शेट्टीने खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्यावर छोटा राजन टोळीच्या दोन सदस्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी जया शेट्टी यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती.