नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये सूर्य आग ओकतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट आली आहे. दिल्ली येथे ५० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून, तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. दिल्लीमध्ये तापमानाने १०० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. दिल्लीत ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला होता. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. आज बुधवारी राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दिल्लीला मान्सून दाखल होईपर्यंत संपूर्ण जून महिना निघून जाईल. त्यामुळे जून हा महिना दिल्लीकरांना आणखी रडवणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
दरम्यान, उत्तर भारतात जणू आकाशातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, अशी गरमी जाणवत आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही पारा ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. झांशी, यूपीमध्ये दिवसाचे तापमान ४९ अंश होते. आग्रामध्ये पारा ४८.६ अंशांवर आणि वाराणसीमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमान होते.