जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
भोपाळ : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडा जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. कुटुंब प्रमुखाने स्वत:च्याच घरातील आठ जणांची घृणास्पद हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने आत्महत्या केल्याने या हत्याकांडाचे कारण शोधणे पोलिसांना अवघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील छिंदवाडातील महुलझीरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी हा आपल्या सर्व कुटुंबासह माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत बोदल कचर या गावात राहत होता. मद्यधुंद असताना या आरोपीने स्वत:च्या पत्नीसह घरातील इतर कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निघृण हत्या केली. त्यानंतर एका १० वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. मात्र ती पळून गेल्याने तिचा जीव वाचला आणि संबंधित माहिती परिसरातील व्यक्तींना दिली.
मानसिकरित्या आजारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या आजारी असून त्याचे नुकतेच २१ मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसात त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. काल रात्री आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये भयंकर वाद सुरु होता. त्या वादादरम्यान आरोपीने आठ जणांची निघृण हत्या करुन स्वत:हा आत्महत्या केली. मृतांमध्ये आरोपीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत आई, वडील, बहिण, भाऊ, वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची निघृण हत्या केली.
दरम्यान, हत्याकांडानंतर संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र पोलिसांना हत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनास्थळी भेट देत निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.