
लातूर : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात आला. दहावी बोर्डाचा यंदाचा निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी दहावीच्या निकालात राज्यातील एकूण १८३ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजे १०० पैकी १०० गुण मिळवले असून त्यामध्ये लातूरमधील १२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही लातून जिल्ह्याने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर विभागीय मंडळात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून विभागातील १ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामधील १ लाख ४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील एकूण ९९ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा ९५.२७ टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्याचा ९६.४६, धाराशिव ९५.८८, तर नांदेड जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल लागला आहे. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही विभागीय मंडळात लातूर जिल्ह्याने अव्वलस्थान मिळवल्याने लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला आहे.