Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

कुटुंबातील सदस्यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसून खेळणार संगीत खुर्ची

कुटुंबातील सदस्यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसून खेळणार संगीत खुर्ची

पंतप्रधान निवडीवरून नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर साधला निशाणा


नवी दिल्ली : "ही निवडणूक केवळ खासदार निवडण्यासाठी नसून ती देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आहे. तुमचे मत देशाचा पंतप्रधान निवडणार आहे, तुम्ही पाटलीपुत्रात बसलात पण दिल्लीचा निर्णय तुम्ही घेणार आहात. भारताला अशा पंतप्रधानाची गरज आहे, जो या शक्तिशाली देशाची ताकद जगासमोर मांडू शकेल. दुसरीकडे, हे इंडिया आघाडीवाले ५ वर्षांत ५ पीएम देण्याची तयारी करत आहेत. पाच वर्षात पाच पंतप्रधानांखाली या देशाचे काय होणार? ५ पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, ज्यामध्ये गांधी घराण्याचा मुलगा, सपा परिवाराचा मुलगा, नॅशनल कॉन्फरन्स परिवाराचा मुलगा, एनसीपी परिवाराचा मुलगा, टीएमसी परिवाराचा मुलगा, आपच्या प्रमुखाची पत्नी, बनावट शिवसेना परिवाराचा मुलगा, आरजेडीचा मुलगा या सर्व कुटुंबातील सदस्यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसून संगीत खुर्ची खेळायची असल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.


देशात आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. तर सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी बिहारमध्ये पाटलीपुत्र येथे जाहीर सभा झाली. पंतप्रधान निवडीवरून नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला. एलईडीच्या जमान्यात ते कंदील घेऊन फिरत आहेत, तेही एकाच घरात उजेड पडत आहे, या कंदिलांनी बिहारमध्ये अंधार पसरवला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत एक्झिट पोल सुरू झाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, जेव्हा हे इंडिया आघाडीचे लोक झोपताना, जागे असताना ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात करतील, तेव्हा याचा अर्थ एनडीएच्या यशाचा एक्झिट पोल आला आहे. ४ जून रोजी पाटलीपुत्र येथे नवा विक्रम होणार असून देशातही नवा विक्रम होणार आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.


नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी भारताच्या कानाकोपऱ्यात गेलो आहे आणि सर्वत्र एकच मंत्र ऐकू येत आहे, सर्वत्र तोच विश्वास व्यक्त होत आहे, फिर एक बार मोदी सरकार. या निवडणुकीत एकीकडे मोदी आहेत, जे २४ तास तुमच्यासाठी कठोर परिश्रम करतील आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे. जी २४ तास खोटे बोलेल. एकीकडे मोदी २४स७ विकसित भारत बनवण्यात व्यस्त आहेत, २४स७ आत्मनिर्भर भारत बनवण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीकडे कोणतेही काम नाही. देशवासीयांनी त्यांना सुटी दिली आहे, काही तुरुंगात विश्रांती घेत आहेत, काही बाहेर राहत आहेत आणि म्हणूनच ही इंडिया आघाडी, दिवस असो वा रात्र मोदींना शिव्या देण्यात मग्न आहे, व्होट बँक खूश करण्यात व्यस्त असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे.

Comments
Add Comment