Saturday, May 31, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Electricity Demand : वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ; महावितरणला फुटला घाम!

Electricity Demand : वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ; महावितरणला फुटला घाम!

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक दक्षता


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच वाढत्या उष्णतेमुळे पंखा, एसी या विद्युत उपकरणांचा वापर वाढला असून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. कमी पडलेला पाऊस आणि विजेची वाढलेली मागणी याचा फटका आता राज्याला बसणार आहे. त्यामुळे राज्यावर सध्या लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे.


महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा ४३ ते ४४ अंशाच्या पलीकडे जात आहे. त्यातच विद्युत उपकरणांचा वापर प्रचंड वाढला आहे. यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असली तरीही विजेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महावितरण अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करून महाराष्ट्राची विजेची गरज भागवत आहे. काल महावितरणाने २३ हजार ५७१ मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला. मात्र सातत्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे वीज मागणी २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांचे कडक लक्ष


ग्रामीण भागातही वातानुकूलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे वीज टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याप्रकरणी कडक लक्ष ठेवले आहे. ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन वीज पुरवठ्याची काळजी घेत आहेत, अशी माहिती महावितरणचे अधिकारी यांनी दिली.


Comments
Add Comment