Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Manoj Jarange Patil : लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार!

Manoj Jarange Patil : लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार!

'या' कारणासाठी करणार उपोषण


जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरातल्या मराठ्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारनेही मराठा आरक्षणासाठी कंबर कसून प्रयत्न केले आणि मराठ्यांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून दिले. मात्र, त्यानंतर जरांगे यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि त्या पूर्ण न करण्याबाबत त्यांनी सरकारला जबाबदार धरले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. त्यामुळे जरांगेंना सर्वच स्तरांतून रोष पत्करावा लागला. यानंतर जरांगेंचा प्रभाव कमी झाला. मात्र, ते आता पुन्हा एकदा उपोषण करणार, अशी त्यांनी घोषणा केली आहे. लोकसभेच्या निकालाच्या (Loksabha Election Result) दिवशीच म्हणजे ४ जूनपासून मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत.


देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणार्‍या या निवडणुकीत विजयाकरता प्रत्येक पक्ष जोरदार प्रचार करत आहे. मात्र, त्यातच मनोज जरांगेंनी उपोषणाची घोषणा करत माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा झालेला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


माध्यमांशी बोलताना आज मनोज जरांगे म्हणाले, “माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे. मुळात सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही. यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचंही नुकसान झालं आहे. सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे, पण ते अजूनही लागू झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.


पुढे ते म्हणाले, “४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असला, तरी सकाळी ९ वाजता माझ्या उपोषणाची सुरुवात होईल. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. सहा कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. मराठा समाजाला आता सगळं माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेतात. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करेल, असा मला विश्वास आहे”, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment