वांगणी, बदलापूर, कल्याणमध्येही पाऊस; वाऱ्यांचा वेग ताशी १०७ किमी
मुंबईतही जोरदार पाऊस
ठाणे : मे महिना आणि उकाडा हे समीकरण असताना यंदा मात्र मे महिन्यातच वरुणराजाने बरसायला सुरुवात केली आहे. अगदी कालपर्यंत प्रचंड गरमी जाणवत असतानाच आज मात्र वांगणी, बदलापूर, कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक, पालघर, ठाण्यातही पाऊस पडत आहे. यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी १०७ किमी आहे.
पुणे, सातारा घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरच्या परिसरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तास साधारणपणे ५० ते ६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईतही जोरदार पाऊस
मुंबईतही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे परिसरात जोरदार पाऊस पडत असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ देखील वातावरणात पसरली आहे.