Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Rain : अवघ्या क्षणाचा पाऊस अन् जीव जाण्याची चाहूल

Mumbai Rain : अवघ्या क्षणाचा पाऊस अन् जीव जाण्याची चाहूल

जाणून घ्या कुठं-कुठं काय घडले?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले आहे. त्यातच आज राजधानी मुंबईत अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह झडप घातली. आणि चांगलच रौद्र रुप दाखवलं. काही क्षणांसाठी आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडल्या आहेत. कुठे मोठ-मोठे होर्डिंग तर कुठे टॉवर कोसळ्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर अनेक ठिकाणी वाहतूकसेवा देखील विस्कळीत झाली. सविस्तर जाणून घ्या कोणत्या ठिकाणी काय घडलं.

महाकाय बॅनरखाली ७०-८० वाहनं अडकली

मुंबईतील घाटकोपर परिसरात एक महाकाय बॅनर पडून मोठं नुकसान झालं आहे. पेट्रोल पंपावरच हे बॅनर कोसळल्याने पेट्रोल पंपाचं नुकसान झालं असून बॅनरखाली तब्बल ७० ते ८० वाहनं अडकली आहेत. या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील पेट्रोल पंपाखाली बाईक आणि रिक्षा चालक अडकले होते. गॅस कटरच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. विशेषत: हे बॅनर हटविण्यासाठी महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच संबंधितास नोटीस बजावली होती, अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

या होर्डिंगच्या घटनास्थळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. श्रीमती अश्विनी जोशी या स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका आणि इतर बचाव यंत्रणांना निर्देश दिले आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक नागरिकांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी २० पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले असून पुढील बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

वडाळ्यात टॉवर कोसळला

वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा परिसरात टॉवर कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. टॉवरखाली अडकलेल्या ४ ते ५ चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. टॉवर दुर्घनटेनंतर अग्निशमन दलाने लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून गाडीतून काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला.

जोगेश्वरीत झाड कोसळलं

सोसाट्याच्या वारा आणि पडलेल्या मुसळधार पावसात जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील मोठे माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे या झाडाखालीच काही लहान मुले खेळत होती. मात्र, सुदैवाने घटना घडण्यापूर्वीच ते तेथून निघाल्याने अनर्थ टळला.

चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप

वादळी वारं आणि मुसळधार पावसामुळे मुंबईतील अतिमहत्वाचा परिसर असलेल्या चर्चगेट परिसराला वाळवंटाचं स्वरुप प्राप्त झालं होतं. येथील ओवल मैदान , हाई कोर्ट , सेशन कोर्ट , मुंबई यूनिव्हर्सिटी राजाबाई टॉवर परिसरही धुळीत अडकला होता.

वाहतूक सेवा काही काळासाठी ठप्प

मुंबईत पडलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर देखील पाहायला मिळाला. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते. ठाण्याच्या रेल्वेवर विजेचा खांब पडल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा काही काळासाठी बंद पडली होती. मुंबई मेट्रोही घाटकोपर मार्गावर ठप्प झाली होती. तर, विमानवाहतूकही वळवण्यात आली होती. आता, वाहतूक सुरू झाली असून सर्वकाही पूर्वपदावर येत आहे.

वीज वाहिनीच्या टॉवरवर भडका, वीजपुरवठा खंडीत

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात हायटेन्शन वीज वाहिनीच्या टॅावरवर स्पार्कींग होऊन आग लागल्याची घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे येथील टॅावरने पेट घेतला. त्यामुळे, ऐरोली,दिघा परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील वीजपुरवठाही खंडीत झाला असून कल्याण ,टिटवाळा,डोंबिवली मध्ये ३ तासांपासून वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -