नेहमी लक्षात ठेवावे की, एका माणसाने कोणत्याही गोष्टीचा साठा केल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी त्याची कमतरता भासते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी!
प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
आज एक चित्र पाहिले आणि खूप अस्वस्थ झाले. त्या चित्रांमध्ये एक आई आपल्या बोटीतून गळ सोडून, मासे पकडत होती. तिची तीन मुले बोटीत बसली होती. पाण्याखालील दृश्य जे आई आणि तिच्या मुलांना म्हणजेच त्या चौघांना दिसत नव्हते. त्या दृश्यामध्ये एक मोठा मासा दाखवला होता. ज्याच्या तोंडापाशी तो गळ आलेला होता आणि त्या मोठ्या माशामागे पोहणारी या माशाची दोन पिल्ले होती. त्या बोटीत असलेली तीन मुले आणि ती चिमुकली माशाची पिल्ले यांच्यासमोर गोलामध्ये एकच वाक्य होते.
‘आई, आमच्या जेवणाच्या शोधात आहे.’
डोळ्यांतून टचकन पाणी आले. प्रत्येक माणूस आपल्या अपत्यासाठी खूप काही करतो. पण कधी त्याच्या लक्षात येते का, आपल्या अपत्यासाठी आपण काही करताना अप्रत्यक्षपणे आपण दुसऱ्या कुणाच्या तरी अपत्याच्या तोंडचा घास काढून घेत आहोत? किंवा कायमचे त्या जीवांना पोरके करत आहोत?
कोणी मुद्दाम वाईट वागत नाही म्हणजे कमीत कमी कोणती आई दुसऱ्या आईच्या मुलांना त्रास होईल, असा विचारच करू शकत नाही. पण हे अप्रत्यक्षपणे घडते… जसे पाण्याच्या आतले दृश्य आपल्याला दिसू शकत नाही किंवा आपण त्याचा विचार करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या पद्धतीने जगत-वागत असतो; परंतु त्यामुळे दुसऱ्या कोणाचे तरी खूप नुकसान होते.
इथे फक्त मानव आणि इतर प्राण्यांचा विचार केला, तर सर्व प्राण्यांमध्ये मानव हा बुद्धिवान प्राणी समजला जातो. त्याने बुद्धीच्या जोरावर अनेक गोष्टींवर मात केली आहे. क्रूर-हिंस्त्र-विषारी प्राण्यांवर, शक्तीपेक्षा युक्तीद्वारे विजय मिळवलेला आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले आहे. लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहेत. त्या प्रमाणात त्या माणसांना लागणारी खाद्यनिर्मिती होत नाही.
अस्तित्वाच्या धडपडीसाठी जीवनचक्र चालू राहते आणि या जीवनचक्रासाठी जी अन्नसाखळी निर्माण केलेली आहे, त्या साखळीप्रमाणे आपण जगत राहतो. कोणत्या प्रकारचे अन्न कुठे आणि किती प्रमाणात निर्माण होते. मग ते वनस्पतीच्या स्वरूपात असो की प्राण्यांच्या स्वरूपात याचा निसर्गामध्ये एक समतोल आहे, असे शालेय अभ्यासक्रमात आपण सर्व शिकलेलो आहोत. आता तो समतोल तळमळलेला आहे.
गेल्या वर्षी ज्ञानगंगा अभयारण्य, बुलढाणा येथे जिप्सी सफारीसाठी गेले होते. एका पाणवठ्यावर वाघ आलेला दुरूनच दिसत होता. वाघ कुणालाही स्पष्टपणे दिसू शकेल, अशा जागी होता. त्याच पाणवठ्यावर अगदी मोजके अंतर ठेवून, काही हरणं बागडत होती. मनात आले, इतका समोर वाघ असूनसुद्धा ही हरणं इकडे-तिकडे पळत नाहीत किंवा कोणत्या झाडाआड, दगडाआड दडत नाहीत? मग मी तो प्रश्न आमच्या सोबत असणाऱ्या गाईडला विचारला. तो म्हणाला की, “वाघाचे पोट भरल्यावरच तो पाणी प्यायला येतो. त्यामुळे या पाणवठ्यावर तो कोणाचेही भक्षण करणार नाही, ही जाणीव इतर प्राण्यांना आहे.”
मी आश्चर्यचकित झाले. इतक्यात जिप्सी चालक सहज म्हणाला की,
“माणसाचे मात्र तसे नाही.”
आम्ही सगळे जण हसलो. मी विचार करू लागले. आजच्या पुरते आपल्या घरात जेवण असले तरी उद्यासाठी, परवासाठी, चार दिवसांनी पाहुणे येणार असतील, त्यांच्यासाठी कुठे स्वस्त आणि सहज खाण्याचे पदार्थ मिळतात, त्याची आपण साठवणूक करून ठेवतो. माणसाला आपला वेळसुद्धा कुठे आणि कसा वाचवता येईल, याचाही विचार करावाच लागतो ना!
यातून शेवटी हेच सांगायचे आहे की, एका माणसाने कोणत्याही गोष्टीचा साठा केल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी त्याची कमतरता भासते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी!