‘अमोल कोल्हे केवळ नाटक करणारा माणूस, अशांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल’
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना खोचक टोला
पिंपरी-चिंचवड : निवडणुकीच्या रणधुमाळीत (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्याची तयारी जोरदार सुरु आहे. देशभरात बड्या बड्या नेत्यांची प्रचार सभा धुमाकुळ घालत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानचे धागेदोरे एक करत काँग्रेसचा (Congress) समाचार घेतला. तसेच अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावरही चांगलाच निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. त्यावेळी महाराष्ट्रासह देशात बॉम्बस्फोट व्हायचे. गेल्या दहा वर्षांत कोणी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली नाही. कारण पाकिस्तानला माहीत आहे त्यांचा बाप दिल्लीत बसला आहे. त्यामुळे भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानची झाली नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर खोचक टोला लगावला.
त्याचपुढे, अमोल कोल्हे हे चांगले कलाकार आहेत. परंतु, कोल्हे यांचा सिनेमा फ्लॉप झाला आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या चित्रपटाची किंवा नाटकांची तिकीट नागरिक घेणार नाहीत. दरवेळीप्रमाणे यावेळी देखील त्यांनी मालिकांमधून निवृत्तीची घोषणा केली. हे केवळ नाटक आहे. अशा नाटक करणाऱ्याला जनता त्यांची योग्य जागा दाखवतील अशी खात्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मोदी फक्त भारताचेच नव्हे तर शंभर देशांचे नेते
जगातील शंभर देश म्हणतात कोविड काळात आम्ही नरेंद्र मोदी यांच्यामुळे जिवंत आहोत. म्हणजे आपले मोदी भारतात नव्हे तर शंभर देशांचे नेते आहेत. पुढे ते म्हणाले, इंडिया आघाडीला पाच वर्षांत पंतप्रधान निवडता आला नाही. ही काय घराणेशाही नाही? फॅक्टरी नाही. इंडिया आघाडीकडे नियत आणि नीती नाही. प्रत्येक नेता स्वतःच्या घरातील व्यक्तीला मोठं करण्यात व्यस्त आहे, असेही फडणवीस म्हणाले.