
जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान...
मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. कार्यकर्त्यांसोबतच राजकीय नेतेमंडळीही उन्हातान्हात प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाला लोकसभा निवडणूक संपली की थोडा ब्रेक लागण्याची शक्यता असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेनंतर लगेच महाराष्ट्रात चार जागांसाठी विधानपरिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) पार पडणार आहे.
विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील चार सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या शिक्षक (Teacher Constituency Election) आणि पदवीधर (Graduate Constituency Election) अशा प्रत्येकी दोन म्हणजेच एकूण चार मतदारसंघांत निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण या विभागात निवडणूक जाहीर झाली असून येत्या १० जूनला मतदान होणार आहे.
दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोटनिस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक जाहीर झालेल्या विभागांपैकी दोन विभागात पदवीधर तर दोन विभागात शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यापैकी मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तर नाशिक आणि मुंबईसाठी शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १३ जून रोजी मतमोजणी पार पडेल.
अर्ज भरण्याची प्रकिया कधी सुरू होणार?
चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया १५ मे रोजी सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १० जून रोजी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १३ जून रोजी होणार आहे.
काय आहेत उमेदवारीचे नियम?
पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांमधून निवडणूक लढविण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी काही नियम आहेत. पदवीधर मतदारसंघातून मतदान करण्यासाठी संबंधित उमेदवाराने रितसर नोंदणी करणे आवश्यक असते. पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मतदाराने किमान तीन वर्षे आगोदर आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे गरजेचे असते.