
जाणून घ्या नेमकं कारण काय?
मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना निवडणुकीचे पहिले, दुसरे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान (voting) पार पडले आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात चार ठिकाणी पुन्हा मतदान होणार असल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र, मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. त्यामुळे या भागात फेरमतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशीन्स जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.
'या' चार जागांवर पुन्हा मतदान होणार
बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील बुथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेरमतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.