फिरता फिरता: मेघना साने
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना निधी देऊन मदत करते. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच समाजाला आपल्या लिखाणातून नवी दिशा देणाऱ्या लेखकांना पुरस्कार देत असते, हे सर्वश्रुत आहेच. पण त्याही पुढे जाऊन, महाराष्ट्रातील मागास गावांचे सक्षमीकरण आणि एकात्मिक विकास साधण्यासाठी ‘पंचम’ नावाचा उपक्रम महाराष्ट्र फाऊंडेशनने सुरू केला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राजीव भालेराव यांनी सांगितले. त्यांच्या या नव्या उपक्रमांत गावांच्या विकासासाठी केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा गावांचे सक्षमीकरण करणे, त्यांना महत्त्वाचे वाटते.
पंचम उपक्रमासाठी साताऱ्याजवळील कुसुंबी आणि गडचिरोलीजवळील मुतनूर या खेड्यांची महाराष्ट्र फाऊंडेशनने निवड केली आहे. या खेड्यांची निवड करताना नवी मुंबईतील आर. एस. सी. डी. (Resource and Support Centre for Development) या संस्थेची त्यांनी मदत घेतली. नवी मुंबई येथील आर. एस. सी. डी. ही संस्था ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या महिला उमेदवारांना ग्रामपंचायतीचे काम कसे चालवायचे, याचे प्रशिक्षण देत असते. महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे.
‘पंचम’ची उद्दिष्टे साधण्यासाठी, निवडक स्थानिक सेवाभावी संस्थांचा समावेश केला जाणार आहे. कुसुंबीत साताऱ्यातील ‘ॲवार्ड’ या संस्थेचा सहभाग असणार आहे, तर मुतनुरमध्ये गडचिरोलीच्या ‘रुद्य’ या संस्थेचा सहभाग असणार आहे. गावांचा विकास साधण्यासाठी, महाराष्ट्र फाऊंडेशनने पाच सूत्रांचा अवलंब करायचे ठरवले आहे. त्यानुसार दारिद्र्य निर्मूलन, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या पाच सूत्रांकडे लक्ष देऊन शाश्वत विकास साधण्याचे त्यांचे ध्येय आहे. प्रत्येक गावाबरोबर महाराष्ट्र फाऊंडेशन ३ वर्षांसाठी प्रतिबद्ध राहील.
पहिल्या वर्षी निवडलेल्या खेड्यासाठी एक ग्रामविकास समिती (Village Development Committee- V.D.C.) स्थापन करून, त्या गावातील समस्यांचा शोध घेतला जाईल. या समितीत गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची इच्छा असलेले नागरिक असतील. गावातील परिस्थितीची कल्पना असलेले हे सदस्य गावातील गरजा निश्चित करतील व त्या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग महाराष्ट्र फाऊंडेशन आखेल. दुसऱ्या वर्षी निरनिराळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून या गरजा पूर्ण केल्या जातील, तर तिसऱ्या वर्षी पूर्ण झालेली कामे गावाच्या ग्रामविकास समितीच्या हाती सुपूर्द केली जातील. तेथून पुढे या समितीने हे काम पुढे न्यावे, अशी अपेक्षा असेल. या प्रकल्पांमधे शक्य तेथे सरकारी योजनांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या संचालक मंडळाच्या मनीषा केळकर, रेश्मा सांबारे, विवेक पाटणकर आणि अध्यक्ष राजीव भालेराव यांनी या दोन गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यानुसार प्रकल्पांचे स्वरूप ठरवले. गावात पहिल्या वर्षी ग्रामविकास समितीची स्थापना झाली आहे. या गावाची शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून, तिथे पाण्याची तीन एटीएम यंत्रे बसविण्यात आली आहेत. तसेच गावातल्या प्रत्येक शाळेला वॉटर फिल्टर पुरवण्यात आले आहेत. गावातील शाळेसाठी न्यूट्रिशन गार्डन तयार केले. अशा प्रकारे आरोग्याचा प्रश्न हाताळला गेला.
आर्थिक उत्पन्न आणि रोजगार वाढीच्या संधीसाठी ‘पंचम’अंतर्गत ‘Agromillets Women Farmer Producer Company’ नावाची शेतमाल उत्पादक संघटना स्थापन केली आहे. या संघटनेमुळे गावाच्या नाचणी उत्पादनात वाढ होणार आहे. या नाचणीला चांगला बाजारभाव मिळणार आहे. तसेच बेकरीत मोठ्या प्रमाणात नाचणीचे पदार्थ बनवून बाजारात विकण्याची सोय होणार आहे. या प्रकल्पात कुसुंबीकर उत्साहाने सहभागी होत आहेत.
याच गावात ‘climate reality project’ या संस्थेच्या सहकार्याने दोन शाळांचे क्षेत्र हरितक्षेत्र बनविण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे शाळा सौरऊर्जा वापरत आहे. पावसाच्या पाण्याची साठवण करत आहे. गावकरी कचऱ्याचे उचित व्यवस्थापन करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गावातील महिलांना निर्धूर चुली तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे या महिलांच्या घरात निर्धूर चुली तर आल्याच, शिवाय या महिला त्या तयार करून, त्यांची विक्रीदेखील करू लागल्या. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. शिवाय प्रदूषण निवारणाची एक छोटी साखळीच तयार होत गेली. वर्षभरात १०० चुली निर्माण करून विकण्याचे उद्दिष्ट गावातील महिलांनी ठेवलेले आहे.
विकासासाठी निवडलेले दुसरे गाव मुतनूर हे गडचिरोलीजवळ आहे. मुतनूर हे आदिवासीबहुल गाव आहे. गावकऱ्यांबरोबरच्या चर्चेत गावाला तलावामुळे बराच लाभ होऊ शकतो असे कळले. ‘पंचम’अंतर्गत तलावासाठी खोलीकरण, बांधारे, पाण्याचे पाट असे बांधकाम करण्यात आले. गावकऱ्यांनी पण या कामात श्रमदान केले. तलावामुळे पावसाळा संपल्यावरही गावकरी दुसरे पिके घेऊ शकतील आणि मत्स्यपालन करून मत्स्य व्यवसाय करू शकतील. यामुळे गावकऱ्यांची मिळकत वाढेल.
मुतनुरच्या प्राथमिक शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी Doorstep Schools या संस्थेच्या सहकार्याने गावातल्या ४ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले. याचा परिणाम म्हणुन मुलांचा उत्साह आणि शाळेतली उपस्थिती वाढली. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या आगामी योजनेनुसार पुढच्या वर्षी ‘पंचम’ उपक्रमांत तीन अधिक गावांचा समावेश केला जाणार आहे.
सर्वांसाठी सामाजीक व आर्थिक न्याय या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या ध्येयाच्या वाटचालीत ‘पंचम’ उपक्रमामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे. अर्थात या उपक्रमाच्या मागे आहे अमेरिकेत स्थित असलेल्या अनेक दानशूर व्यक्तींची सामाजिक जाणीव आणि सेवाभावी संस्थांचे कष्ट.
[email protected]