उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप
नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha) महत्त्वाची आहे. या ठिकाणी महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ही जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आली. मात्र ठाकरे गटाने विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचा पत्ता कट करत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार, अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.
दरम्यान, महायुतीतून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे करंजकरांची ती आशाही मावळली. शिवाय नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज नेणाऱ्या करंजकर यांनी अखेर आज अर्ज दाखल केला आहे.
उद्धव ठाकरेंवर केला आरोप
आपल्याला वर्षभरापूर्वी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि ऐनवेळी उमेदवारी कापली, असा आरोप विजय करंजकरांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला. त्यामुळे अखेरीस आपण उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्याबरोबर शिवसेनेचे ३५ माजी नगरसेवक आणि चार जिल्हा परिषद सदस्य तसेच काही पदाधिकारी असल्याचेही ते म्हणाले. यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.