मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. तब्बल १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताला विजय मिळवता आला आहे.कोलकाताने मुंबईला २४ धावांनी हरवले.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. कोलकाताची एकवेळ अशी परिस्थिती होती की त्यांनी त्यांचे ५ फलंदाज ५७ धावांवर गमावले होते. मात्र त्यानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी स्थिती सुधारली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. वेंकटेश अय्यरने ५२ बॉलमध्ये ७२ धावांची ताबडतोब खेळी केली. तर मनीष पांडेने ३१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या.
खरंतर आयपीएलमध्ये ही धावसंख्या काही मोठी नव्हती मात्र मुंबईला तितक्याही धावा करता आल्या नाहीत. मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात एकाकी लढत दिली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एकामागोएक मुंबईचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे मुंबईला केवळ १४५ धावाच करता आल्या. शेवटचे तीन फलंदाज तर लगेचच एकामागोमाग बाद झाले.