Monday, March 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेCentral Railway : लोकलच्या गर्दीचा सात दिवसात तिसरा बळी!

Central Railway : लोकलच्या गर्दीचा सात दिवसात तिसरा बळी!

डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दी ठरली जीवघेणी

डोंबिवली : उपनगरात रहाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लोकल ट्रेन लाईफलाईन समजली जाते. मात्र, उपनगरातून मुंबई शहराच्या दिशेने जाताना आणि परतीच्या वाटेवर ही (Central Railway) लाईफलाईन या धावपळीतील फिनिशिंग लाइन ठरत आहे. लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवाला लागत आहे. लोकलच्या या गर्दीमुळे मागील सात दिवसात आता तिसरा बळी गेला आहे.

मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल अष्टेकर असे मृत प्रवाशाचे नाव आहे. याआधी डोंबिवली स्टेशनवरून लोकलने प्रवास करणाऱ्या अवधेश दुबे, रिया राजगोर यांचा गर्दीने लोकल मधून पडून मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांमधला हा तिसरा बळी लोकलच्या गर्दीने घेतला आहे. यातील दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तर तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत राहणाऱ्या तरुणीचा लोकल मधून प्रवास करताना तोल जाऊन पडून मृत्यू झाला. रिया राजगोरे ही तरुणी डोंबिवलीहुन लोकलने मुंबईला कामाला निघाली होती. नेहमी प्रमाणे ती डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलध्ये चढली. मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती खाली पडली, त्यात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रवाशांकडून रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची आणि आहे त्या गाड्या वेळेवर चालवण्याची मागणी होत आहे. सध्या सुरू असलेल्या लोकल १५ ते २० मिनिटे उशीरा आल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो आणि मग वेळेत आपल्या कामावर जाण्यासाठी आलेल्या गाडीत सर्व प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करीत असतात. अनेकदा रेल्वे प्लॅटफॉर्मवर उशीरा येत असलेल्या ट्रेन विषयी घोषणा केली जात नाही आणि पुढील ट्रेन किती वेळानंतर आहे हे देखील सांगितले जात नाही. त्यामुळे कामावर जाणारे आणि सुट्टीच्या दिवसात मुलाबाळांना घेऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना आलेल्या ट्रेन शिवाय पर्याय राहात नाही. रेल्वेने यावर विचार करावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -