अयोध्या : अयोध्येमध्ये(ayodhya) श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामनवमी पर्यंत दिवसाला एक ते लाख भाविक राम मंदिरात दर्शनासाठी येत होते. मात्र रमनवमीनंतर कडाक्याचा उन्हाळा आणि गरम हवेमुळे भक्तांची गर्दी कमी झाली. रामनगरीमध्ये भक्तांची संख्या घटली आहे. याचा सरळ परिणाम अयोध्येच्या कारभारावरही पाहायला मिळाला आहे.
अयोध्येमध्ये दिवसाचे तापमान ४० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे भक्तांची गर्दी कमी झाली आहे. श्रीरामाच्या दर्शनासाठी जिथे लाखो भक्तगण यायचे त्यांची संख्या आता हजारांमध्ये आली आहे. अशा स्थितीत होम स्टे आणि गेस्ट हाऊस संचालकांनीही आपले भाडे कमी केले आहे. रामनवमीच्या आधी ज्या हॉटेलचे भाडे ३ हजार ते ३५०० रूपयांपर्यंत होते ते आता १ हजार ते २ हजार रूपये इतके झाले आहे.
रामनवमीनंतर भक्तांची संख्या घटली
रामनवमीनंतर बुकिंग अतिशय कमी झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रूम एकदम भरलेल्या होत्या. एका दिवसाचे भाडे ३ हजार ते ३५०० रूपयांपर्यंत होते मात्र आता १५०० ते २००० इतके झाले आहे.
विमान कंपन्यांनीही भाडेदरात केली कपात
अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने विमान कंपन्यांनीही आपल्या भाडेदरात कपात केली आहे. दिल्ली, मुंबई कोलकाता, अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांतून येणाऱ्या राम भक्तांसाठी विमान कंपन्यांननी भाडे कमी केले आहे.






