Share

अनेक लोक अतिविचारांनी ताणतणावाच्या चक्रात अडकले जातात. अतिविचार करणे हा मानवी मनाला अडसर ठरू शकतो. सतत फक्त विचारातच गुंग असल्याने व्यक्तीचे कृतीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वर्तमानातील महत्त्वाचा वेळ वाया न जाऊ देता एका मर्यादेपेक्षा विचार करणं आवश्यक आहे. यासाठी मन:शांतीचे तत्त्व आत्मसात करा. अतिविचारांच्या भोवऱ्यातून मुक्त व्हा व एक सशक्त आयुष्य जगा.

ओंजळ – पल्लवी अष्टेकर

संत बहिणाबाई यांची मानवी मनावर एक सुंदर कविता आपल्याला माहीत आहे.

‘मन वढाय वढाय,
उभ्या पिकातलं ढोर,
किती हांकला हांकला,
फिरी येतं पिकांवर’

आपल्या मनाच्या विविध अवस्थांचे वर्णन संत बहिणाबाई यांनी अतिशय समर्पक शब्दांत केले आहे. बहिणाबाई परमेश्वराला विचारतात की, “देवा, अशी कशी ही मनाची करामत? कारण, मनासारखी चालणारी दुसरी कोणतीच गोष्ट या जगामध्ये नाही.” मनाच्या विविध अवस्थांपैकी आणखी एक अवस्था, म्हणजे अतिविचार करण्याची. अतिविचार करणे हा मानवी मनाचा एक अडसर आहे. विचारांचा विचार करण्यात गुंतणे, सतत स्वत:च्या विचारांची जाणीव असणे, अचानक येणाऱ्या विचारांचा ताण अशा गोष्टी यात अंतर्भूत आहेत. अनेकदा व्यक्ती आपल्या विचारांना प्रश्न विचारणे, त्यांच्या योग्यतेवर शंका घेणे, त्यांचे पृथ्थकरण किंवा अंदाज यात अडकून पडते. अतिविचार करणारी व्यक्ती पुन:पुन्हा एकच विषय घोळवित राहते.

माधुरी नोकरी करायची. तिच्या नवऱ्याची मिळकतही बेताचीच होती. एकत्र कुटुंब होतं, त्याचेही ताणतणाव वेगळे असायचे. माधुरीला दोन मुले होती. सर्वांची खाणी-पिणी, घरातील कामे याचा ताण तिच्यावर असायचा. अगदी घरकामाला बायका असल्या, तरी माधुरीचे विचारचक्र थांबायचे नाही. दिवसभर धावपळीत वावरल्याने, ती संध्याकाळी थकलेली असायची. ऑफिसातील कामेही वेळेत पूर्ण करण्याचे बंधन तिच्या डोक्यावर असायचे. तिच्या मनातील एका कप्प्यात कामांची न संपणारी यादी असायची. मुलांची आजारपणे, घरातील सणवार, पै-पाहुणे या गोष्टी अपरिहार्य होत्या. ऑफिसमधून निघताना सासूबाईंचा घरातल्या सामानांसाठी फोन यायचा.

यामध्ये माधुरीने अतिविचार टाळण्यासाठीची कौशल्ये जाणून घेऊन कृतीत आणणे जरूरीचे आहे. जसे की, अधे-मधे सुट्टीच्या काळात सहली काढणे, दैनंदिन जीवनात काही प्रमाणात बदल करणे. अनेकदा ‘आहे त्या गोष्टीचा स्वीकार करण्यानेही’ तणाव टाळला जातो. जर अनेक प्रसंगांशी जुळवून घेणारी कला आपण आत्मसात केली, तर अकारण होणारी भांडणे व त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव टळतील. अतिविचारांच्या लक्षणांमध्ये झोपेचा त्रास, डोकेदुखी, भूतकाळाबाबत विचार करण्यात बराच वेळ घालविणे, आपल्या चुकांचा सतत विचार करणे, एखाद्याने सांगितलेली गोष्ट मनात धरून सतत त्यावर विचार करणे, चिंता व तणाव मनातून काढण्यास असमर्थ ठरणे. अतिविचार करणारी व्यक्ती याबाबत बरेचदा अनभिज्ञ असते.

माधुरीने एकाच वेळेस असंख्य कामांचा विचार करण्यापेक्षा, महत्त्वपूर्ण कामे अगोदर व ज्या गोष्टींची घाई करण्याची गरज नाही, त्यांच्यावर काट मारणे गरजेचे आहे. कुटुंबात काही जबाबदाऱ्या इतरांवर सोपवा किंवा त्यांना स्वत:हून काही जबाबदाऱ्या स्वीकारू द्या. यातून तुमची मुले व कुटुंबातील इतर सदस्य यांनासुद्धा तुमच्या कष्टांची जाणीव होईल. दररोज त्याच त्या चक्रात पिसण्यापेक्षा अधे-मधे स्वत:च्या छंदांनाही जरूर वेळ द्या. एखाद्या अतिश्रमामध्ये नोकरी करणारे लोक, थकले तरी पाठोपाठ काम करणारे लोक असे लोक बहुतांशी वेळा अतिविचारांच्या चक्रात अडकलेले असतात.

अतिविचारांनी सतत ताणतणाव निर्माण होतो. अशी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत फाटे फोडण्याची सवय असते. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होत नाही. त्यामुळे रूक्षता, फटकळपणा, रागीट स्वभाव, उतावीळपणा, उदास, नाराज चेहरा, मन आनंदी नसणे, धडधड, डायबेटिस, बी. पी. अशा गोष्टी निर्माण होण्याची प्रवृत्ती अधिक असते. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे चांगली तब्येत असणे. योग्य आहार, विहार, निद्रा यांचे संतुलन मनावरही योग्य परिणाम करते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार-ताज्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा. चमचमीत, तेलकट पदार्थ टाळावेत.

खरं तर व्यक्तीने सुपरमॅन होण्याचा मार्ग न शोधता, आपल्या अपेक्षा कमी करणं, हा सर्वात सोपा व वास्तवाला साजेसा उपाय आहे. आपला ताणतणाव टाळण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेणं, ही एक महत्त्वाची गोष्टं आपण करू शकतो. जुळवून घेणं म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करणं. आपली ध्येय एखाद्या गोष्टीबद्दलची आपली समज, अपेक्षा यांच्यात बदल करणं. सर्वात महत्त्वाची गोष्टं म्हणजे, आपला स्वत:वर ताबा असणं व आपल्या आयुष्याचे सूत्रधार आपण स्वत: आहोत, हे लक्षात ठेवणं.

अस्वस्थता व अतिविचार यांच्यात आपलं लक्ष विचलित करण्याची, तसेच आपला संभ्रम आणखी वाढविण्याची ताकद असते. जेव्हा आपण या विचारांचं नीट आकलन करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की, यातले बरचसे विचार म्हणजे निव्वळ गोंधळ आहेत व त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपलं स्वत:वर नियंत्रण आहे, हे जितक्या ठामपणे तुम्हाला वाटेल तितकी तुम्ही अतिविचार करण्याची शक्यता कमी होते. कामं अर्धवट ठेवणं टाळा. एकावेळी अनेक कामं करणं टाळा. एका कार्याची निवड करा, त्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित करा, ते पूर्ण करा व मग नवीन कार्याची निवड करा.

त्यामुळं आता पुढं कोणतं काम आहे, याचा अतिविचार करणं बंद होतं. ताणतणाव व दबाव येऊ नये म्हणून अर्धवट कामे सोडू नका. अनेक डॉक्टर्स सुचवितात की, फार यश-अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे. निर्णय घेण्याला फार महत्त्व आहे. नेहमी माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे, या विचारात गुंतून पडल्याने निर्णय घेताच येणार नाही. सतत फक्त विचारातच गुंग असलेल्या व्यक्तीचे कृतीकडे दुर्लक्ष होते. पुढचा विचार करणं चांगलं असलं, तरी एका मर्यादेपेक्षा तो करणं, यातून आताचा वर्तमानातील महत्त्वाचा वेळ वाया जाऊ शकतो.

मन:शांतीचे तत्त्व आत्मसात करा. तुम्ही शिथिल होऊन तुम्हाला आवडेल, अशा एखाद्या शांत, गुढ जंगलाची, समुद्रकिनाऱ्याची, पुस्तक वाचत बसल्याची कल्पना करू शकता. काही लोकांना सतत काळजी करण्याची सवय असते. त्यांचे काळजीचक्र सातत्याने सुरूच असते. त्यानेही अतिविचार सुरू राहतात. जेवढी तुम्ही काळजी करण्यास विलंब करता, तेवढी तुमची काळजी करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. तुमच्या विचारांची पुनर्रचना करा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. लक्ष विचलित करणाऱ्या विचारांच्या तुम्ही नियंत्रणात नसून तुमच्याकडे पर्याय आहे, हे तुम्ही स्वत:ला शिकवित जा.

काही दृष्टिकोन आपल्या आयुष्यात आणण्याची गरज आहे. जसे की, जे नियंत्रणात ठेवणं शक्य नाही, त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही जे नियंत्रणात ठेवू शकता, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जे हवं आहे, त्यावर नाही, तर तुम्हाला ज्याची गरज आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. अतिविचारांच्या भोवऱ्यातून मुक्त व्हा व एक सशक्त आयुष्य जगा.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago