
नारायण राणे यांनी केली घणाघाती टीका
कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गेल्या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी संपवली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कुपवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात करून या निवडणुकीमध्ये विकास करणाऱ्या आणि भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या भाजप पक्षाला मतदान करा, हे मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी होणार आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कुपवडे येथील साई मंदिर हॉल येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,डॉ. मिलिंद कुलकर्णी,प्रदेश सदस्य संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष दादा साईल,सरपंच दिलीप तवटे,बाळू मडव,नारायण गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले जगामध्ये भारताचा दर्जा निर्माण केला. देशातील करोडो लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला. गोरगरीब जनतेसाठी ५४ योजना आणल्या आणि त्या राबविल्या असे सांगून त्यांचे हात बळकट करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करून पुन्हा एकदा भाजपची सत्ता घेऊन येण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ९० सालापूर्वीचा सिंधुदुर्ग आठवला तर या जिल्ह्यांमध्ये पाणी,आरोग्य, रस्ते, वीज या मूलभूत गरजांसाठी जनता त्रस्त झाली होती. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या सुविधा मिळत आहेत यासाठी माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याला दिली. या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून माझी सातत्याने तळमळ राहिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत असताना मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदान कमळ या निशाणी वर द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले.