Thursday, January 15, 2026

OMG! सांबर, फिश करी आणि मिक्स मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर?

OMG! सांबर, फिश करी आणि मिक्स मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर?

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये मसाला विक्री थांबवण्याचे आदेश

नवी दिल्ली : मसाल्याचे (Masala) खमंग पदार्थ आपण मोठ्या चवीने खातो. मात्र हेच मसाले आपल्यासाठी जीवघेणे देखील ठरू शकतात, असे एका पाहणीत निदर्शनास आले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरच्या सरकारने यातील एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्याची विक्री थांबवली आहे. (Sambar, Fish Curry, Mix Masala) तसेच तेथील नागरिकांसाठी या सरकारने काही सूचना देखील जारी केल्या आहेत. यामुळे भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या काही उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हाँगकाँग आणि सिंगापूर येथील खाद्य संरक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार, या दोनपैकी एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्यात इथिलीन ऑक्साइड नावाचा घटक प्रमाणापेक्षा अधिक आहे. या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साइड या घटकाला कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या "समूह १ कार्सिनोजेन" यामध्ये वर्गीकृत केलेले आहे.

यामुळे हाँगकाँगचे खाद्य सुरक्षा मंडळ सेंटर फॉर फूड सेफ्टीच्या (सीएफएस) म्हणण्यानुसार, करी पावडर, सांबर मसाला आणि करी पावडर, मिक्स मसाला पावडर, फिश करी मसाले यांची विक्री थांबवण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये कीटनाशक आणि इथिलीन ऑक्साइड आढळले आहे.

सेंटर फॉर फूड सेफ्टीनुसार त्यांनी या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मसाल्यांची नियमित चाचणी केली. त्यासाठी हाँगकाँगमधील तीन दुकानदारांकडून या मसाल्यांचे नमुने घेण्यात आले. याच नमुन्यांत कीटनाशक, इथिलीन ऑक्साइड असल्याचे आढळले. त्यानंतर सेंटर फॉर फूड सेफ्टीने विक्रेत्यांना या मसाल्याची विक्री थांबवण्याचा आदेश दिला.

एकीकडे हाँगकाँगमध्ये तीन मसाल्यांवर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे सिंगापूरमध्येही दुसऱ्या एका मसाल्याची विक्री थांबवण्याचा आदेश देण्यात आला. सिंगापूरच्या खाद्य सुरक्षा (एसएफए) प्राधिकरणाने या उत्पादनांत इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण निश्चित प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे.

एसएफएच्या म्हणण्यानुसार इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यावर शरीरावर प्रतिकूल परिणाम होत नाही. पण या घटकाचा समावेश असलेल्या पदार्थांचे बऱ्याच काळापासून सेवन केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment