Sunday, May 18, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

CM Eknath Shinde : राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला!

CM Eknath Shinde : राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला!

आदित्य ठाकरेंकडून प्रचंड अपमानास्पद वागणूक, माझ्या खात्यात ढवळाढवळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले गौप्यस्फोट


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत एक दावा केला आणि भाजप नेते संतापले. फडणवीस आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदाचं मार्गदर्शन करुन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'त्यावेळी मी मंत्री असूनही मला आदित्य ठाकरेंकडून प्रचंड अपमानास्पद वागणूक मिळायची, माझ्या खात्यात ढवळाढवळ केली जायची. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी तर उद्धव ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार काळात मला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. नगरविकास खात्याचा मंत्री असताना आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता. मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते. नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.



राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला


पुढे ते म्हणाले, मला नक्षलवाद्यांकडून धोका होता. अनेक वेळा धमक्या देखील मिळाल्या होत्या. नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला Z+ सिक्युरिटी देण्यात आली नव्हती. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मंत्री असून देखील वर्षावर बोलावून ताटकळत ठेवलं जात होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.

Comments
Add Comment