Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Maharashtra Weather: पुढील ७ दिवस 'या' ठिकाणी पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार!

Maharashtra Weather: पुढील ७ दिवस 'या' ठिकाणी पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार!

तर मुंबईत असेल 'असं' वातावरण


मुंबई : राज्यातील अनेक भागांत तापमानात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील अनेक भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.



काही भागांमध्ये पावसाची शक्यता


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. आगामी पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच विदर्भातील कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.


सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.



मुंबईत असे राहणार तापमान


मुंबईसह किनारपट्टी भागात तापमानात घट दिसून आल्याचं पहायला मिळतं. यामुळे वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३४ अंशांवर राहिलं आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरी ३९ तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा सरासरी ४२ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. मात्र मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागणार आहे.

Comments
Add Comment