अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज
प्रत्येक जण भक्ती करतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरिता भक्तिमार्गातली पहिली पायरी म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, नि:स्वार्थी परमात्मस्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वत:ला विसरणे, देहबुद्धी विलगीत होणे ही होय. देहरक्षण परमात्म प्राप्तीकरिता करावे. केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट?
विविध उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर, ज्याच्यावर प्रेम असते, त्याला आपण जो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दु:खच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले, तर ते स्वत:करिताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे?
संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली, म्हणून आम्हाला जिकडे-तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. १३ कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ, १३ कोटी जप व्हायला रोज १०-१२ तास या प्रमाणात जवळजवळ १२ वर्षे लागतात, इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग ते विषयप्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे.
तात्पर्य : नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे.