अलबत्त्या गलबत्त्या नाटकानंतर होणार सिनेमात रुपांतर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
मुंबई : चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या (Albattya Galbattya) नाटकाने चांगलीच रंगभूमी गाजवली होती. ‘अलबत्त्या गलबत्त्या’ पेक्षा चिंची चेटकीण जास्त लोकप्रिय झाली. छोट्या प्रेक्षकांसह मोठ्यांनीही या नाटकला उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता. आता हे नाटक सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
सिनेमाच्या टीझर मध्ये वैभव चिंची चेटकिणीच्या रूपात दिसत असून “किती गं बाई मी हुशार” हे चेटकिणीचं लाडकं वाक्य ऐकू येतं. या टीझरने सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या टीझरवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स करत या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘अलबत्त्या गलबत्त्या’ या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत. वरुण नार्वेकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून थ्री डी रूपात बच्चेकंपनीला हा सिनेमा एन्जॉय करता येणार आहे. संजय छाब्रिया, सुधीर कोलते आणि ओंकार माने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
रत्नाकर मतकरी यांनी नाटक स्वरूपात लिहलेल्या या अलबत्त्या गलबत्त्या गोष्टीवर आधारित सिनेमा येत असून सिनेमाच्या दृष्टीने त्यात कथानकात काय बदल झाले असतील हे पाहणं चित्तवेधक असणार आहे. १ मे २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.