Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Chandrapur News : धक्कादायक! चंद्रपूरमध्ये नागरिकांना अन्नातून विषबाधा

Chandrapur News : धक्कादायक! चंद्रपूरमध्ये नागरिकांना अन्नातून विषबाधा

दिडशे जण रुग्णालयात दाखल; एकाचा मृत्यु


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून आतापर्यंत तब्बल १५० जणांना विषबाधा झाली आहे. सर्व नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. (Chandrapur Food Poisoning News)


माजरी येथे शनिवारी नवसाची पूजा ठेवण्यात आली होती. यानिमित्त रात्री जेवणाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. पाचशेहून अधिक लोकांचा या पूजेत सहभाग होता. पूजेनंतर सर्व नागरिकांनी जेवण केले, महाप्रसादाचा लाभ घेतला. जेवण करून कार्यक्रम उरकल्यानंतर सर्व व्यक्ती घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास एकामागोमाग अनेक जणांना अचानक त्रास जाणवू लागला. असं पाहता शंभरावर लोकांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले.


मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीडशेहून अधिक लोकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नंतर हा आकडा वाढतच गेला त्यामुळे हॉस्पीटल देखील कमी पडू लागले. त्यामुळे काही जणांना भद्रावती आणि वरोरा येथे हलवण्यात आले. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण समोर आले आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जेवण ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषध प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट करून चौकशीसाठी जात असल्याचे सांगितले.


दरम्यान, या घटनेत एकाचा मृत्यु झाला आहे. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचं नाव असून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment